ओठापासून पोटापर्यंत जाणाऱ्या प्रत्येक घासाची चव ओठांवर रेंगाळते.. अन, पोटी गेल्यावरही खाल्या मिसळीचा रसस्वाद आपल्याला मनस्वी तृप्तता देत असतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे खरोखर दर्दी खवय्ये गर्दी करतात.
आधी सगळ्यांच नाशिककरांना बेफाम आवडलेल्या साधना मिसळीचा परिसर आजकल पर्यटकांनी फुलतो. पण, त्यांच्या मिसळ ब्रँडची ग्लोरिफाय झालेली चव आता तशी राहिली नाही हे खंतवतेच. मात्र, रामभाऊ यांच्या मिसळीची बात तशी नाही. तुम्हाला इथं येऊन काही वर्षे जरी झाले असतील तरी पुन्हा आलात तरी तीच चव तुम्हाला मिळेल, याची मी लेखी हमी देऊ शकतो. यामुळेच की काय, इथे तीन वर्षात मिसळीची किंमत ३० वरून ५० रूपये इतकीच वाढली आहे....
मला मिसळ खात जगभरच हिंडायची मनीषा आहे. ती वेळ येईन तेव्हा येईल पण जगाच्या पाठीवर उत्कृष्ट मराठी पदार्थ म्हणून मिसळ मान्यताप्राप्त आहे. ती ज्या हॉटेलची तिथेही मी जाऊन 'आस्वाद' घेतला. पण, माझा सपशेल भ्रमनिरास झाला. त्याचं काही नाही, नाशिकहून जाऊन ती खाणे, रस्ता शोधत तिथपर्यंत पोहोचणे अन, मिसळीसाठी कोरी शंभराची नोट मोडणे फारच जीवावर येऊन गेलं. फारच तेव्हा मन हेलावून गेलेलं होतं. आता, ह्याबद्दल मला खरंच वाईट वाटले नसते पण, त्या शेवेच्या उंची मसालेयुक्त सजावटी भाजीला मिसळ म्हणून खाने झाल्यामुळे तेव्हाची बोच अजूनही हळहळवते...
 |
pic credit :- author |
असो, आज मात्र अकरा वाजेदरम्यान माझं जाणं झालं होतं. छोटेखानी दोनच खोल्या असल्याने रविवारी गर्दी जास्त होते. एकाच वेळी तीन-चार कुटुंब सहज मिसळ खाऊ शकतात, इतकीच इथली जागा. अस्मादिक अक्षरशः झोप मोडून आल्यागत जाऊन टेबलावर ठाण मांडत बसले. मटकी, शेव, कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, दही, पापड, तर्री, रस्सा आणि पाव अशा सर्व मूळ सामग्रीसह सुग्रास मिसळ माझ्या पुढ्यात हजर झाली. हो, मिसळ ही याच मूळ पदार्थांनी तयार होणारं व्यंजन आहे.
मिसळ खाताना आपोआपच घामाच्या धारा तुम्हाला निथळवून टाकतात, आपण त्याकडे दुर्लक्ष करत आणखीन थोडा रस्सा-तर्री ओतून मिसळ खाणे सुरू ठेवावे. शेवटी, प्रथेनुसार(जगात कोणत्याही मिसळीला खाताना ही प्रथा पाळावी) केवळ रस्सा, तर्री घेऊन त्यात पाव बुडवून खावा, हे असे खातानाचा क्षण, त्या दिवसभरात विसरणे मुळीच शक्य नाही. हे असं करून खाल्लं तरच मिसळीने आपलं पोट भरलं अशी मनात भावना निर्माण होते. यानेच मिसळ खाण्याचा शेवट करावा. ते योग्य ठरते.
सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण म्हणून आरामात आपण खाऊ शकतो. (अगदीच अडी-नडीला संध्याकाळी ग्रहण करावी, पण तत्पूर्वी वैद्यकीय सल्ला आवश्यक.)..
मागील काही शुक्रवार मंत्रालयातील मिसळही खाण्याची संधी गवसणे क्रमप्राप्तच होते. त्या मिसळीस खाताना तर मग सुदर्शनची मिसळ जोरातच आठवत होती. याचं कारण, मंत्रालय उपहारगृहातील मिसळीचा जो रस्सा आहे, त्याचीही लज्जत न्यारी आहे. यामुळे हर शुक्रवारची मंत्रालयातील न्याहरी उदभरणनोहे करूनच सोडते. न 'चुकवावी' अशीच. राज्यातील नोकरदार, चाकरमानी, करभरणा करणारे सर्वच लोकांनी ह्या स्पेशल मिसळीवर ताव मारायला हवा. इतकी तिची चव वाखाणण्याजोगी आहे.
याशिवायही संबंध महाराष्ट्रात अनेक ठिकाणची मिसळ आपापल्या वैशिष्ट्ये जपून आहेत. नाशिककर म्हणून मात्र सुदर्शन हॉटेलचीच मिसळ माझ्या मनात कायम राहील. हे धडधडीत त्रिकालाबाधीत सत्य होय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा