मला माझाच स्वतःचा राग येत होता. एकतर माझे मन आता ऐकवत नव्हते, जसा, जसा उशीर होत होता, तसे ते बेफिकीर, उदान घेऊ पाहत होते, मात्र मागे माझीच माणसे थांबली होती., कदाचित मला डोळेभरून पाहत होती, मी कधीही त्यांच्यापासून एकट्याने एवढा दूर प्रवास केला नव्हता ना, त्यामुळे एक काळजी, माया, ममता सगळेच आर्त भाव मला त्यांच्या डोळ्यात साठलेले दिसू लागले होते.. एकीकडे त्यांचे माझ्यासाठी गहिवरून येणे होते आणि एकीकडे होते माझ्या मनाचे भिरभिरणे. मला विचार करून इतकं अस्वस्थ व्हायला झाले की हे लोक असे कितीवेळ ताटकळत उभे राहतील ? त्याने माझ्या मुक्त, स्वच्छंद जगाचा नीट आनंदही मी उठवू शकत नव्हतो, अन पुन्हा मलाही त्यांची ओढ लागायची, मध्येच मग त्या वेळेचं, आपल्या माणसांचं तिथेच थबकनेही खटकायचं, कधीकधी विचार येऊन जायचा, आपण खरंच दूरवर(टूरवर) निघालोय खरं, मात्र सगळ्यांना सोडून जाताना कापरी स्पंदने विचार करायची जे होतेय ते चूक, अपराध, गुन्हा तर नाही ना... कारण माझ्यासोबत माझ्यावर प्रेम करणारी माणसे होतीच पण रक्ताच्या नात्यांची ओढ, त्यांची ममता यांना तोड ही नसतेच ! किमान ज्यांना ती असतात त्यांना तरी.
येणकेन सर्व काही प्रेमळ शिष्टाचार पार पडले आणि मी निघालो पुढच्या माझ्या प्रवासाला, हळूहळू वेग वाढत, अंतर कापत सरसर, याने फक्त चालण्याला वेग येणार असला, तरी झोकात निघालेल्या माझे अंतर वाढतच होते, कारण मला जायचेच मुळी बरेचसे लांब होते. सर्वकाही यथासांग आरामशीर करून घेण्यासाठी एक माणूस हा प्रत्येक प्रवासात सगळ्यांच्या सोबत असतोच, माझ्याही सोबत तो होताच, असणारच, कोण माझ्यासोबत असणार हे ठरवणारा मी कोण ? मी कोणासोबत असणार हे ठरवण्याचा अधिकारही मला नाही. वाटते की सगळेच प्रवास जे काय घडणारे असतात ते एकदाच एका डायरीत कोणीतरी शेड्यूल्ड केले आहेत. गम्मत म्हणजे आपल्याला ती डायरी जागृत, जगत असताना तरी कधीही सापडू शकत नाही, एकवेळ स्वप्नात ती शोधता येते, किंवा मग नश्वर देहाचा त्याज्य भाग गळून गेल्यावर उरणाऱ्या आत्म्याला ती गवसते, पण तसल्या सापडण्यात खरेच मजा नाही कारण मग सगळे किस्से, गूढ, गुपितं ही फुटलेली असतात, तोपर्यंत मग काय मजा, पण जेव्हा ती अचानकपणे आपल्यापुढे मंडळी जाता, ती समोर येतात, भोवती पिंगा ज्यावेळी ह्या गूढ घटना घालू लागतात तेव्हा खरे निरालस आयुष्य जगतोय असे म्हणायचे. तेच खरेखुरे ज्वलंत प्रवास. असो तर मी प्रवासाला, लागलो, बसलो.
आतापर्यंत कधीच वाटलेच नव्हते असेही काही जगेन म्हणून, याचमुळे की काय स्वतःला बांधून बांधूनच ठेवत असायचो पण आता, तसे बांधून ठेवण्याची काहीच गरज नव्हती. कारण धुरंधर अशा मला तितकेच रस्पानी, अणूकुचीदार निर्मळतेची साथसंगत लाभणार होती, पण तरीही स्वतःवरचा ताबा सुटू न देणे पण बाकी तसे मोकळे होणे याचा मी निश्चय केले. अधूनमधून मग पुन्हा त्याचा नात्यांची, नात्यांतल्या एकात एक मिसळेल्या नाजूक रेशमी वेटोळ्यांची आठवण राहून राहून व्हायचीच, मग जरासे हरवून, आतल्या आतल्या बाजूंना निरखत असताना, आजूबाजूचा जरा विसर पडायचा. शेवटी मनाला निक्षून सांगितले की काहीही झाले तरी आता जरा या हृदयाच्या धडधड्तेलाही मागे सुडेल इतकी बेभान,बोभाट वाजवी धडधड माझ्या आसपास होत असताना, जरा इतरत्रच्या गोष्टीत गुंतणे टाळलेलेच बरे ... आणि मग कल्ला, राडा, मस्ती, धिंगाणा असे सारेच शब्द बेधुंद, होऊन जोशात थिरकायला लागले त्यांच्यासोबत अर्थातच मी ही थिरकायला सुरुवात केली.
जरा वेळेसाठी जगलेले ते ‘बंध’ पुनश्च त्यांच्या गाभार्यात, मर्मात जाऊन विराजमान झाले, अन मी. हिरवी पाने, पिवळी पाने, लाल फुले आणि मी....... माझा रंध्रा रंध्रातून ओसंडून आता माझा प्रवास सुरु झाला होता. माझे क्षितीज तिथे मी येण्याची हुरहुरती आस लावून स्वागतास सज्ज होती पण मी मात्र प्रवास लांबण्याची वगैरे वाट पाहत होतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा