अतिसंपर्काने काय साध्य ?
माणूस आणि समाज या एकमेकांशी नाळ जोडलेल्या गोष्टी आहेत. पण या दोन्ही गोष्टी जर जुळायच्या असतील तर या दोघांना एक रोग जडावा लागतो, संपर्काचा. हो हा संसर्गजन्य रोग तुम्हाला जडला की तुम्ही माणूस म्हणून समाजात गणले जाऊ लागतात. अन समाजाला संपर्कामुळेच तुम्हीही किंमत देऊ लागतात. अशी आहे लक्षण या असाध्य रोगाचे यावर अनेकदा इलाज होवूच शकत नाही. एकदा का संपर्कात राहणे खुशावह वाटू लागले की मग कुणी त्यातून सुटू शकत नाही. अधिक अधिक संपर्क वाढता ठेवला जातो, कधी त्यामागे काहीही स्वःहेतू नसतो, बऱ्याचदा तो असावा लागतो, किंवा संपर्क ठेवायला तुम्हाला काहीही कारण हे चालू शकते.
संपर्क ठेवण्याचीही आता विभिन्न माध्यमे उपलब्ध झाली आहेत, याला बहुदा तप काळ लोटला असावा, पारंपारिक माध्यमांचा आधुनिकीकरणात निभाव लागला नाही त्यामुळे ती भंगारात निघाली आहेत. थेट संपर्क, पत्रव्यवहार, तार यांचा विषय घ्यावा तर, तार सेवा बंदच झाली आहे, पत्रांमध्ये मायेचा ओलावा आटून गेल्याने फक्त व्यवहार उरला असल्याने त्याबद्दल चर्चा म्हणून बोलण्यासारखं, फार काही सापडत नाही. कमीत कमी शब्दात प्रांजळ धमक्या देणे हे व्यवहारी पत्रांचे खरेखुरे कार्य. विनंती करणारे पत्रही याच पठडीतले असतात. गुलाबी पत्र ही खुपचं अगदी त्याचा किंवा तिचा अट्टाहास असेन तरचं पाठवली जातात, बाकी ही अशी मनावर मोरपीसे फिरवणारी पत्रे कालबाह्य कधीच होवून गेलीत ! या संपर्कांतून आठवणी साध्य.
चला, आता ताबडतोब नवीन संपर्कमाध्यमांकडे येतो. तर, या माध्यमांत एक खूप मोठे गिमिक आहे ज्यामुलेच आपण एकमेकांच्या सतत संपर्कात राहू लागलोय, अन जरा तरी कुणी संपर्कक्षेत्राच्या, आउट ऑफ कव्हरेज झालं तरी कासावीस व्हायला होते, प्रयत्न करतेवेळी तार, कनेक्शन जुळलेच नाही तर मनाची बैचेनी वाढत जाते, हृदयाचे ठोके वाढत जातात, मग हळूहळू अनेक विचार डोक्यात शिरकाव करतात. मग अशी एक वेळ येते की सगळंच असह्य होवून बसते, प्रचंड चीडचीड झाल्याने मानसिक अन शारीरिक त्रास होवू लागतो, थकवा जाणवतो. पण अनेक मंडळींच्या बाबत असे पण होते की ते अत्यंत कुशलतेने, कुशाग्र वागून हा वाढवून ठेवलेला अतिसंपर्क एवढा सुव्यवस्थित हाताळतात की त्यांच्या लेखी ताणताणाव न येत, समृद्धीचेच दान पडते, यामुळेच तर जनसंज्ञापन विषय अभ्यासाला का जातो, जेणेकरून संपर्क ठेवून राहणारी व्यक्तीला सगळ्या उलाढालीची कटकट वाटू नये. शैलीवर अवलंबून असणार्या गोष्टींतून चांगल-वाईट, नवीन(सर्व) माध्यमांतून संपर्कामुळे साध्य.
हा झाला माणूस आणि समाज यांच्यातील संपर्कावर छोटासा एक्स रे रिपोर्ट. याहूनही अजून एक वेगळा संपर्क असतो, मी म्हणेल तो अतिशय महत्वाचा तो म्हणजे स्वतःचा स्वतःशी संपर्क, संवाद. माझ्याबाबतीत बोलायचे झाले, नेहमीच माझा माझ्याशी अविरत संवाद चालूच असतो. सदर लेख लिहितानाही मी माझ्याशी संभाषण करत आहे. हो अगदी बरोबर, स्वसंभाषणातून उमगत जातो आपण आपल्यालाच. नसलेली, कधी न झालेली, झाकोळून गेलेली सगळ्या प्रकारे स्वतःची स्वतःस ओळख होते ती याच स्व संपर्कातून. मग कुणी वैज्ञानिक या प्रकारे स्वतःला अभ्यासात असेल का ? सर्जनशील वृत्तीचा विज्ञानाशी काही सबंध आहे का ? मनात विचार, पडणारे प्रश्न हे वस्तुनिष्ठ मांडण्याची हिम्मत आपण कितीवेळा करतो ? सतत स्वतःस खोदत राहणे, खोडत राहणे, एकाग्र, मश्गुल आणि एकट्याशीच बोलत राहणे हे मनोविकृतीच ना ? किंवा लोकं तरी ठरवत असतील, अशा गोष्टी करण्यांस वेडा ? नानापरीमळू, धुंवाधार प्रश्नांचा मुसळधार वर्षाव हा स्वतःचा स्वतःशी संपर्क ठेवल्याने वाढू लागतो, यातून अनेकदा काही साध्य होते, अनेकदा होतही नाही. पण सतत विचारंतून स्वतःच्या(मननात) संपर्कात असणे वेगळे साध्य करविते तर ध्यानस्थ, चिंतनात राहण्यातून वेगळेच साध्य होते.
माणूस अन समाज पारंपारिक संपर्क माध्यमे त्यागात पुढे चालू लागल्याने तात्विक संभाषणे वाढली, संपर्क राखण्यात खरेपणा कमी-अधिक येऊ लागल्याने साध्य असे काहीच झाले नाही हे म्हणणे इष्ट ठरते. अपवाद काही विस्मयचकित गोष्टी वगळता.
स्वतःशी संपर्क वाढवून स्वतःच्या आंतरिक स्फूर्ती, शक्तींचा वापराची सरावातून येणारी खुबी साध्य होते. परंतु डाव उलटला मानसिक असंतुलन घडून येते.
संपर्क नावाच्या क्लिष्ट रोगापासून चार हात लांब राहणे हेच त्यावर मात करण्यासारखे आहे, कारण यात दोन्ही गोष्टी समसमान पातळीवर घडतात, साध्य आणि असाध्य.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा